
सुप्रसिद्ध धावपटू पी.टी उषा यांची एक नवी सुरवात,राज्यसभेवर होणार नियुक्ती,
सुप्रसिद्ध धावपटू पीटी उषा, संगीतकार इलैया राजा, प्रख्यात पटकथा लेखक व्ही विजयेंद्र प्रसाद आणि अध्यात्मिक गुरू वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे.
पी.टी उषा यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. “विलक्षण! पीटी उषाजी तुम्ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहात. क्रीडा क्षेत्रातील तुमची कामगिरी सर्वश्रुत आहेच पण गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे तुमचे कार्य तितकेच कौतुकास्पद आहे.”
उषा यांनी आशियाई स्तरावर एका दशकाहून अधिक काळ स्प्रिंट आणि ४०० मीटरमध्ये वर्चस्व गाजवले होते. १९८५ जकार्ता आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी पाच सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले. एका वर्षानंतर सोल आशियाई खेळांमध्ये उषा यांनी चार सुवर्ण आणि एका रौप्य पदकावर आपले नाव कोरले होते.
आशियातील त्यांनी मिळवलेल्या वर्चस्वाबद्दल बोलताना उषा म्हणाल्या “मी कुठल्याही चॅम्पियनशिपकडे फक्त एक स्पर्धा म्हणून बघत पदक जिंकले नाही. सुमारे एका दशकाहून अधिक काळ मी भारतासाठी खेळले आणि अनेक सुवर्णपदके जिंकली. १९८४ पासून मी माझ्या कामगिरीने शिखर गाठले.”
आशियाई क्रीडा स्पर्धा,आशियाई चॅम्पियनशिप आणि युरोपमधील ग्रँड प्रिक्स या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणे ही काही साधी कामगिरी नव्हती.भारतीय ऍथलेटिक्ससाठी हा एक अद्भुत काळ होता.